देवरुख (रत्नागिरी) : शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव मार्लेश्वरचा विवाह रविवारी (१४ जानेवारी) दुपारी सनई चौघड्यांच्या सुरात आणि मंगलाष्टक, तसेच मंत्रांच्या मंगलमय वातावरणात कोंडगावची श्री देवी गिरिजा हिच्याबरोबर थाटात झाला. या सोहळ्यासाठी असंख्य भाविकांनी सह्याद्रीच्या कपारीत शनिवारपासून गर्दी केली होती. मार्लेश्वर देवस्थान रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यात वसलेले आहे.
आंगवली येथील मूळ मठात विवाहापूर्वीचे सर्व विधी झाल्यावर शनिवारी रात्री श्री देव मार्लेश्वरची मूर्ती, चांदीचा टोप सजविलेल्या पालखीत प्रथेप्रमाणे ठेवण्यात आला. याचबरोबर गंगामाता आणि मल्लिकार्जुनाची मूर्तीही पालखीत स्थानापन्न झाली. त्यानंतर आंबवची दिंडी, वांझोळेची कावड, देवरुखची दिंडी, विवाहसोहळ्याचे यजमानी वाडेश्व्र देवाची पालखी आदींचे मानकरी व भाविकांसह आंगवली मठात आगमन झाले. शनिवारी मध्यरात्री १२ वाजता हर हर मार्लेश्वगरचा जयघोष करीत हा सारा लवाजमा मार्लेश्वर शिखराकडे निघाला. ढोल, ताशे, गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीत श्री देव मार्लेश्वरची पालखी मार्गस्थ झाली. पालखी वाहण्याचा मान प्रथेप्रमाणे भोई समाजाचा होता, तर सोबत मशालजी म्हणून चर्मकार बंधू, मारळचे सुतार, अबदीर, कासारकोळवणचे ताशेवाले, चौरी, न्हावी बंधू याचप्रमाणे मानकरी असलेले आंगवलीचे अणेराव बंधू आदींसह हजारो भाविक यामध्ये सहभागी झाले होते.
हा सारा लवाजमा आणि साखरप्याहून आलेल्या वधू गिरिजादेवीची पालखी शिखराच्या पायथ्याजवळ असलेल्या पवईच्या पायरीवर उत्तररात्रीनंतर एकत्र आल्यावर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने सारा सह्याद्री दुमदुमून गेला. शिखरावर पोहोचल्यावर तिन्ही पालख्यांचे प्रथेप्रमाणे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर तिन्ही पालख्या नियोजित ठिकाणी वस्तीला गेल्या. सोबत मानकरीही होतेच. पहाटे मुलीचे घर पाहणे, मागणी घालणे, मुलाचे घर पाहणे, पसंती, ठरावनामा, कल्याणविधीची वेळ ठरवणे असे विधी झाले. रविवारी दुपारी विवाहासाठी ३६० मानकऱ्यांना रीतसर निमंत्रण देण्यात आले. त्यानंतर मुहूर्तावर श्री देव मार्लेश्वार आणि गिरिजादेवीचे लग्न लावण्यात आले. यासाठी आधीच हिंदू धर्मातील लिंगायत धर्मीय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करण्यात आली होती. या वेळी करवलीचा मान प्रथेप्रमाणे गोठणे गावाकडे होता. मंगलाष्टके आणि मंत्रोच्चारांच्या मंगल वातावरणात हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. ‘तदेव लग्नम्...’चे सुर मंडपात घुमले आणि सर्व भाविकांनी परमेश्वाराचे लग्न लावण्याचा अपूर्व योग साधला.
विवाहानंतर उपस्थित भाविकांनी देवाला जानवी अर्पण केली. त्याचप्रमाणे नवीन प्रथेप्रमाणे नवरा, नवरीला आहेर देण्यात आला. या वेळी सौभाग्यवतींनी फुले, पानाचा विडा, सुपारी, बांगड्या, हळद, पिंजर अशा वस्तू असलेली परडी करंबेळीच्या डोहात अर्पण केली. त्यानंतर नवविवाहितांच्या मूर्ती सर्व विधी झाल्यावर मार्लेश्वराच्या गुहेत ठेवण्यात आल्या. यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रमही झाला.
रविवारी यात्रोत्सवाचा मुख्य दिवस असल्याने होणारी गर्दी लक्षात घेऊन संपूर्ण मारळ परिसरासह मार्लेश्वर पायथा ते शिखर, धारेश्वर धबधबा आणि करंबेळीचा डोह आदी भागात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवरुखचे पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील शनिवारपासूनच यात्रास्थळी विशेष लक्ष ठेवून होते. राज्य परिवहन महामंडळाने पार्किंगपासून थेट पायथ्यापर्यंत जाणारी विशेष बससेवाही सुरू केली होती. याचप्रमाणे देवरुख, संगमेश्वर, साखरपा, माखजन, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, राजापूर, दापोली अशा आगारांतून एसटीच्या जादा फेऱ्याही हजारो प्रवाशांना घेऊन मारळनगरीत दाखल झाल्या होत्या.
यात्रोत्सवाच्या ठिकाणी अनेक स्वयंसेवी संस्थांनी खिचडी प्रसाद, मोफत सरबत, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा पुरविण्याचे उपक्रम राबविले. यात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. रविवारी तिन्ही पालख्यांनी मार्लेश्वर शिखरावर वास्तव्य करून, सोमवारी (१५ जानेवारी) सर्व पालख्या व मानकरी पायथ्याकडे आले.